वणी शहरात अनोळखी हजारो भिकाऱ्यांचा उच्छाद –पाण्याची टाकी असुरक्षित, प्रशासन झोपेत? नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.
रस्त्यावर परिवार फिरवून, रोज उखळतात लाखो रुपये, भिकाऱ्यांची नोंद कोण घेणार.
राजु तुरणकर – संपादक.
वणी शहरात मागील आठ दिवसांपासून भिकाऱ्यांची संख्या अचानक वाढल्याचे दिसून येत आहे. शहरातील विविध रस्त्यांवर, चौकात आणि विशेषतः पाण्याच्या टाकीजवळ शेकडो भिकारी तळ ठोकून बसलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.
आज पाण्याच्या टाकीजवळ काही भिकाऱ्यांमध्ये किरकोळ कारणावरून जोरदार वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस वाहन घटनास्थळी दाखल झाले, मात्र कोणतीही ठोस कारवाई न करता निघून गेल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

शहरातील दुकानदार, कार्यालयीन कर्मचारी व सामान्य नागरिकांना हे भिकारी वारंवार त्रास देत आहेत. पैसे मिळेपर्यंत सतत मागे लागणे, दुकानात किंवा ऑफिसमध्ये जबरदस्तीने प्रवेश करणे अशा प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
विशेष म्हणजे, ही मंडळी नेमकी कुठून आली, त्यांचा उद्देश काय आहे, याची कोणतीही माहिती प्रशासनाकडे नाही. अनेक कुटुंबे लहान मुलांसह रस्त्यावर वास्तव्यास आहेत, ज्यामुळे सामाजिक आणि सुरक्षेचे प्रश्नही निर्माण झाले आहेत.
शहरातील भिकाऱ्यांची तात्काळ नोंद व पडताळणी करावी,गरजूंना पुनर्वसनाची व्यवस्था करावीना, गरिकांना त्रास देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी शहरात नियमित पोलीस गस्त वाढवावी
वणीकर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने त्वरित ठोस पावले उचलावीत, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
पाण्याच्या टाकीवर भिकाऱ्यांचा ताबा? वणी शहरात पाणी सुरक्षेचा गंभीर प्रश्न!
वणी शहरातील पाण्याच्या टाकीजवळ मागील काही दिवसांपासून हजारो भिकारी येऊन मुक्काम ठोकत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. टाकी परिसरातच झोपणे, वावर करणे यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
ही परिस्थिती अत्यंत धोकादायक असून, पाण्याच्या स्त्रोताजवळ कोणत्याही प्रकारची अनधिकृत वस्ती असणे हे नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. पाण्याच्या टाकीची सुरक्षा, स्वच्छता आणि नियंत्रण यावर पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.












