कॉंग्रेसचे वीज वितरण कंपनी विरोधात दसऱ्याच्या दिवशीही उपोषण
दसऱ्याच्या दिवशी देखील शेतकरी हितांसाठी उपोषण सुरूच
उपोषणा सुरू, मात्र विजेचा लपंडाव सुरूच, अधिकाऱ्यांचा कामचुकारपणा, कर्मचारी व ठेकेदार बेलगाम.
आनंद नक्षणे
मारेगाव तालुक्यातील वीजवितरणच्या सुरू असलेला भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी शेतकऱ्यांना सिंचनासाठी वेळेवर वीज देण्यात यावी या मागणीसाठी काँग्रेस कमेटी मारेगावच्या वतीने वीज वितरण कंपनीला निवेदन देवून विजेचा लपंडाव थांबवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र दिलेल्या इशाऱ्याचा कालावधी संपल्याने मारेगांव येथे २३ ऑक्टोबर पासून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशकर खुराणा यांच्या नेतृत्वात उपोषण सुरु करण्यात आले.
वीज वितरण विभागाकडून सतत होत असलेल्या अघोषीत लोडशेडिंग व शेतकऱ्याच्या खरिप हंगामातील पिकांना सिंचनासाठी वेळेवर न मिळणार वीज वेळेवर मिळावी म्हणून मारेगाव तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने, वेळेवर वीज उपलब्ध करून घ्या अन्यथा पाच दिवसानंतर आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनातून दिला होता. त्यानंतर सुद्धा मस्त्वाल अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देणे, कर्मचारी व ठेकेदार यावर वचक नसल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवणे या प्रकाराला त्रस्त होऊन सोमवारपासून मारेगाव पोलीस पेट्रोल पंपासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली. या उपोषणाच्या माध्यमातून लोडशेडींग पूर्णता बंद करा, शेतकऱ्याना २४ तास वीज उपलब्ध करून द्या, तालुक्यात १३२ के व्ही चे उपकेन्द्र तयार करा, ग्राहकाची संख्येनुसार नवीन विद्युत केंद्रांची मान्यता घ्या, वनोजादेवी , कुंभा, वेगाव, रोहपर येथे ३३ के व्हीचे उपकेन्द्र तयार करा, होणारी वसूली त्वरीत थांबविण्यात यावी, कृषी पंपाचे कनेक्शन त्वरीत जोडण्यात यावे या मागणीसाठी दोन दिवसापासून दसऱ्याचा दिवस असूनसुद्धा जीवाची पर्वा न करता काँग्रेस शेतकरी हितासाठी आमरण उपोषणाला कमेटीचे तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा नगरसेवक आकाश बदकी, अंकुश माफुर उपोषणाला बसलेले आहे. संपूर्ण विश्वाचा अन्नदाता शेतकरी आहे या शेतीला सगळ्यात आवश्यक असतं पाणी मात्र ते दिवसा मिळत नाही, रात्री बेरात्री साप वाघ विंचू हा सगळा धोका पत्करून शेतकरी शेतात पाणी देतात. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव झाल्यानंतरही शेतकऱ्यांच्या या महत्त्वाच्या प्रश्नावर तोडगा कधी निघेल असा सवाल विचारला जात आहे.