आदिवासी जननायक बिरसा मुंडा जयंती निमित्ताने… स्वातंत्र्यासाठी लढणारा एक आदिवासी योद्धा बिरसा मुंडा यांना देवाचा दर्जा…
राजू तूरणकर—वणी.
भारतीय स्वातंत्र्यलढयात आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर, १८७५ रोजी रांची जवळील लिहतू खेडेगावात सुगमा मुंडा आणि करमी हातू या दाम्पत्याच्या पोटी झाला. याच बालकाने लढवय्या न्याय हक्कासाठी मोठा लढा उभारुन जे महान कार्य केले त्याला तोड नाही.त्यामुळेच बिरसा मुंडा यांना आदिवासी जननायक हा कीताब जनतेनेच बहाल केला.
त्यांचे वडील शेतमजूर होते. घरच्या गरीबीमुळे त्यांना इंग्रजी माध्यमाच्या चाईबासा इंग्लिश मिशनरी स्कूलमध्ये शिक्षणाची संधी मिळाली. इंग्रजी शिक्षणामुळे त्यांच्यावर आधुनिक विचारांचा प्रभाव पडला. परंतु त्यांना भारतीय संस्कृतीचा मनस्वी अभिमान होता व तो त्यांनी निरंतर जपला. नैतिक आचरणाची शुद्धता व एकेश्वरवादाचा त्यांनी पुरस्कार केला. ब्रिटिशांनी १८७८-७९ मध्ये प्रथमच वनाबद्दलचा कायदा केला व जंगल सरकारच्या मालकीचे झाले. ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये आदिवासींच्या वनसंपत्तीवर असलेल्या अधिकारावर बाधा येण्यास सुरुवात झाली. आदिवासींना यामुळे बेघर व्हावे लागले. आदिवासींनी उदरनिर्वाहासाठी काही फळ, कंदमूळ, लाकुड्फाटे अथवा जनावरांसाठी चारा तोडल्यास त्यांना शिक्षा होऊ लागली आणि आदिवासीयांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला. हे रोखण्याकरीता आदिवासींनी न्यायालयात याचिका दाखल केली व आदिवासींचे वनाधिकार पुनर्स्थापित करण्याची मागणी केली. परंतु सरकारने ती फेटाळल्यामुळे आदिवासी समाजात प्रचंड रोष निर्माण झाला.
सन १८९४ मध्ये बिहार राज्यात भीषण दुष्काळ पडला होता. या दुष्काळामध्ये उपासमारी व महामारीने अनेक लोक मृत पावले. त्यावेळी त्यांनी गरीब आदिवासी समाजाची निःस्वार्थी अंतःकरणाने सेवा केली.
ब्रिटीश सरकारने आकारलेला अवाजवी शेतसारा माफ करुन दुष्काळावर मात करण्याकरिता त्यांनी जनआंदोलन केले. हे आंदोलन जहागीरदार व जमीनदार यांच्या शोषणाविरुद्ध होते. त्यामुळे सामाजिक संतुलन बिघडून अशांतता निर्माण होत असल्यामुळे ब्रिटिशांनी जहागिरदार व जमीनदारांच्या माध्यमातून बिरसा मुंडा यांना रोखण्याचा प्रयत्न केला. १८९५ मध्ये बिरसा मुंडा यांना दोन वर्षाचा करावास झाला त्यांना हजारीबाग तुरुंगात पाठविले. त्यामुळे सरकारविरुद्ध असंतोष वाढत गेला व ब्रिटिश सत्ता उखडून टाकण्याचा संकल्प त्यांनी केला. दोन वर्षाचा सश्रम कारावास उपभोगून परत आल्यानंतर आदिवासींच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी राजकीय स्वातंत्र्याची आवश्यकता त्यांनी ओळखली. त्यासाठी संपूर्ण आदिवासी समाजाला संघटित करण्यासाठी प्रयत्न करुन त्यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध स्वातंत्र्यलढा पुकारला.
सन १८९७ नंतर बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाने ब्रिटिश सरकारविरुद्ध अनेक लढाया करुन त्यांना जेरीस आणले. त्यांनी पारंपारिक शस्त्रांद्वारे म्हणजे धनुष्यबाण, भाले इत्यादींच्या साहाय्याने डोंगराळ भागातून ब्रिटिशांवर हल्ले चढवले. ब्रिटिश सरकारकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे होती. तरीदेखील १८९८ मध्ये तांगा नदीच्या काठावर बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशसैन्याला नामोहरम केले. नंतर अतिरिक्त कुमक आल्यामुळे ब्रिटिशांनी आदिवासी नेत्यांना रोखण्यात यश मिळवले. त्याप्रसंगी सुमारे ४०० आदिवासी शहीद झाले. यात बिरसा मुंडा यांचे योगदान मोठे होते. सन १९०० मध्ये बिरसा मुंडा डोमबाडी पहाडांमध्ये आदिवासी जनतेस मार्गदर्शन करीत असताना, ब्रिटिश सैन्याने हल्ला चढविला व त्या ठिकाणी भीषण लढाई झाली. त्यांना चक्रधरपूर येथे बंदी करुन रांची कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली. २० मे १९०० रोजी बिरसा मुंडाला एकांत कोठडीत एकटे ठेवले होते. बिरसाने जेवण करणे नाकारले. त्याच दिवशी ते न्यायालयात बेशुध्द पडले. न्यायालयातून कारागृहात आणले. औषधोपचार सुरु केला. जेल अधिक्षक एंडरसनच्या औषधोपचाराने बिरसाच्या प्रकृतीत सुधारणा दिसत होती. सात जून पर्यंत बिरसा ठिक होत. मात्र दि. ९ जून १९०० रोजी बिरसाला रक्ताची उलटी झाली ते बेशुध्द पडले. त्यातच त्यांचा मृत्यु झाला. मृत्युचे कारण ‘एशियाटिक कॉलरा’ हे शासनाने दिले परंतु एकही लक्षण एशियाटिक कॉलराशी जुळत नव्हते. नेपोलियनला आर्सेनिक देवून जसे ठार मारण्यात आले तिच लक्षणे बिरसा मुंडाच्या शरीरावर दिसत होती. मुंडाच्या प्रथेनुसार त्यांना दफन करावयास पाहिजे होते परंतु कारागृहातच दफन करून मृत्युचा पुरावा नष्ट केला. अशा या थोर क्रांतिकारक स्वातंत्र्य सेनानी वीर बिरसा मुंडा यांना लोकवाणी जागरण परिवारातर्फे शतशः कोटी कोटी नमन..