मारेगावात वंचितचे “जवाब दो” आंदोलन…!

0
511

मारेगावात वंचितचे “जवाब दो” आंदोलन…!

मारेगाव नगरपंचायतीचा अजब फतवा. 

 शासनाच्या आदेशाला तीलांजली देत, जनतेची केली जात आहे आर्थिक लूट.

राजू तुरणकर – संपादक.

जन्म व मृत्यू यांच्या नोंदणीचे विनीयमन करण्याबाबत व त्यांच्याशी निगडित असलेल्या बाबी संबंधित तरतूद करण्यासाठी “जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९” या भारत सरकारच्या अधिनियमाला, मारेगाव नगरपंचायतिच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांकडून मुठ माती देत, अजब फतवा काढीत, चक्क नगरपंचायत हद्दीत असणाऱ्या जनतेची आर्थिक लूट केली जात आहे. या अन्यायकारी धोरणाचे विरोधात वंचित बहुजन आघाडी तालुका मारेगाव मैदानात उतरली असून, प्रजासत्ताक दिनाचे आदल्या दिवसापासुन मारेगाव नगरपंचायत कार्यालया समोर, “जिल्हाधिकारी साहेब जवाब दो” या बेमुदत घंटानाद आंदलनाचे कार्यकर्त्यांनी रणसिंग फुंकले आहे.

“समस्यांचे बाजारगाव” असलेल्या मारेगाव नगरपंचायतीची ख्याती तशी संपूर्ण जिल्हाभरच आहे. या ना त्या कारणाने गाजत असलेली नगरपंचायत म्हणून प्रसिद्ध असलेल्या नगरपंचायतीने आणखी एक बेजबाबदारपणाचा कळस गाठला आहे. जन्म मृत्यू नोंदणी संदर्भातल्या शासनाच्या अधिनियमाला तिलांजली देत, आर्थिक लुटीचा फतवा काढीत सामान्य जनतेची आर्थिक लुट करण्याचा जणू काही सपाटाच लावला की काय असेच काहीसे चित्र संपूर्ण मारेगाव शहरभर आहे.

विशेष म्हणजे नगरपंचायत मारेगाव यांनी, जन्म व मृत्यू नोंदणी करीता लागणारी कागदपत्रे याबाबतचे कुठलेही विवरण प्रसिद्धी फलकावर लावलेले नव्हते. मन मानेल तसे उत्तर देत सामान्य जनतेला वेठीस धरत व तिची आर्थिक लूट करन्याचा सपाटा अलिखित पद्धतीने नगरपंचायतीकडून सुरू होता. जेव्हा की शासनाच्या जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियमानुसार नियम आणि अटीला अधिनस्त राहूनच जन्म मृत्यूची नोंद करणे बंधनकारक आहे.

या आर्थिक लुटीच्या भंडाफोड झाला तो, वंचित बहुजन आघाडीचे गजानन चंदनखेडे यांची आजी नामे अनुसया विठ्ठल नगरराळे यांचे २६ डिसेंबर २०२४ ला वृद्धापकाळाने निधन झाले होते. तिचा अंत्यसंस्कार मारेगाव स्मशानभूमीत झाला होता. हिच्या मृत्यूची नोंद करण्यासाठी गजानन चंदनखेडे यांनी दिनांक १० जानेवारी २०२५ ला नगरपंचायतीला रीतसर अर्ज होता. मात्र गजानन चंदनखेडे यांच्या अर्जाला केराची टोपी दाखविल्या गेली व मृत्यूची नोंद करून घ्यावयाची असल्यास शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर वरती प्रतिज्ञालेख करून आणल्याशिवाय मृत्यूची नोंद होणार नाही. असे खडसावून सांगितल्या गेले व प्रतिज्ञालेख आणल्यानंतरच मृत्यूची नोंद घेतल्या गेली. या प्रकरणानंतर नगरपंचायत मारेगाव च्या भ्रष्टाचारी यंत्रणेचा खरा चेहरा सर्वांच्या समोर आला. जेव्हा शासन अधिनियमानुसार, विहित मुदतीत जन्म मृत्यूची नोंदणी करण्यासाठी तोंडी किंवा साध्या कागदावरती स्वयंघोषणापत्र सादर केल्यानंतर संबंधितांच्या जन्म व मृत्यूची नोंद करण्याबाबत अधिनियमात तरतूद आहे.

वंचित बहुजन आघाडी मारेगांवचे वतीने छेडण्यात आलेले “जवाब दो” आंदोलन तालुकाध्यक्ष गौतम दारुंडे यांचे मार्गदर्शनात, आंदोलक गजानन चंदनखेडे यांचे सह अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे राजू निमसटकर यांचे हस्ते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून घंटानांद आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या महिला तालुका अध्यक्ष नूतनताई तेलंग, जिल्हा सचिव प्रणिता ठमके, जिल्हा उपाध्यक्ष मंगल तेलंग, स्मिता खैरे, अश्विनी खाडे, संजय जीवने, हुसेन ढोबरे, हरिभाऊ रामपुरे, शेख दिलदार, सुमित गेडाम, सचिन मेश्राम, विजय मेश्राम, विजय खाडे, वासूमित्र वनकर, मोरेश्वर खैरे, विनोद बदकी, पत्रकार ज्योतिबा पोटे, प्रा. सतीश पांडे, प्रफुल्ल भगत आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 ” प्रजासत्ताक दिनाचे आदल्या दिवशी नगरपंचायत मारेगाव कार्यालयाचे समोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुरू केलेल्या “जवाब दो” आंदोलनाची दखल घेत न. प. मारेगाव चे नगराध्यक्ष डॉ. मनीष मस्की यांनी आंदोलनस्थळाला भेट देत आंदोलकांशी चर्चा केली व आंदोलकाला त्वरित न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही दिली.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here