मुख्याधिकाऱ्याच्या कारभारावर काँग्रेसचा जोरदार हल्ला; आंदोलनाचा इशारा.
‘नमो उद्यान’ आणि बोअरवेल प्रकरणावरून संताप, प्रशासनावर गंभीर सवाल.
राजु तुरणकर – संपादक.
वणी (प्रतिनिधी) : शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांवरून वणी काँग्रेस कमिटी आक्रमक झाली असून, मुख्याधिकारी नगरपरिषद वणी यांच्या कारभारावर जोरदार हल्ला चढवण्यात आला. यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाचा अक्षरशः “क्लास” घेत नागरिकांच्या समस्यांचा पाढाच वाचला.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या निवेदनात शहरातील विकासकामांतील विलंब, अपूर्ण कामे तसेच ‘नमो उद्यान’ संदर्भातील त्रुटींवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. “फक्त उद्घाटन आणि नामफलक लावून विकास होत नाही, प्रत्यक्षात सुविधा दिसल्या पाहिजेत,” असा टोला यावेळी लगावण्यात आला.
तसेच, टागोर चौक परिसरातील बोअरवेल कामांबाबतही पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप करत, पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर योग्य नियोजन न केल्याबद्दल प्रशासनाला जबाबदार धरले. कोणत्या निकषांवर बोअरवेलची ठिकाणे निश्चित केली, याची स्पष्ट माहिती देण्याची मागणी करण्यात आली.
मुख्याधिकारी राजकीय झगडे लावु पाहत आहे – विकेश पानघाटे यांचा गंभीर आरोप.
विविध शासकीय कार्यक्रमांमध्ये लोकप्रतिनिधींना अपेक्षित सन्मान दिला जात नसल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. शासनाच्या परिपत्रकानुसार प्रोटोकॉल पाळला जात नसल्याचा आरोप करत प्रशासनावर टीका करण्यात आली. असून मुख्याधिकारी नगरपरिषद वणी राजकीय समन्वय साधत नाही व त्यामुळे शहरात राजकिय झगडे लावत असल्याच्या गंभीर आरोप काँगेस तालुका अध्यक्ष विकेष पानघाटे यांनी केला आहे.
यावेळी काँग्रेसकडून प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला असून, दिलेल्या मुदतीत प्रश्न निकाली न निघाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे ‘नमो उद्यान’ आणि बोअरवेल प्रकरणासह इतर मुद्द्यांवर वणीतील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य काँग्रेस सरचिटणीस संजय खाडे, यवतमाळ जिल्हा महिला अध्यक्ष वंदना आवारी, वसंत जिनिंग अध्यक्ष प्रमोद वासेकर, तालुका अध्यक्ष विकेश पानघाटे, शामा दीदी तोटावार, वणी शहर अध्यक्ष अशोक पांडे, अॅड. रुपेश गुणवंत ठाकरे, लक्ष्मण पोन्नलवार, मनोहर नागपुरे, सुधीर खंडाळकर, प्रेम तोडकर आदी काँगेस कार्यकर्ते उपस्थित होते.













