“‘वनवासी’ वक्तव्याविरोधात वणीत आदिवासी समाज आक्रमक; राष्ट्रपतींना निवेदन”
केंद्रिय गृहमंत्री अमीत शहा यांच्या वक्तव्याचा निषेध.

वणी, दि. १ जून : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकत्याच दिल्लीत आयोजित जनजाती सांस्कृतिक कार्यक्रमात आदिवासी समाजाचा उल्लेख “वनवासी” असा केल्याच्या निषेधार्थ वणी येथील आदिवासी सोशल फोरमच्या वतीने राष्ट्रपतींकडे निवेदन सादर करण्यात आले.
उपविभागीय अधिकारी, वणी यांच्या मार्फत पाठविण्यात आलेल्या या निवेदनात आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. आदिवासी समाज हा जल, जंगल आणि जमिनीचा मूळ निवासी असून “वनवासी” हा शब्द त्यांच्या मूळ ओळखीचा अवमान करणारा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, आदिवासी समाजाची स्वतंत्र संस्कृती, भाषा, परंपरा आणि इतिहास असून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही अनेक आदिवासी वीरांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. अशा समाजाला “वनवासी” संबोधणे म्हणजे त्यांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अस्तित्वालाच दुय्यम ठरवण्याचा प्रयत्न असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

आदिवासी सोशल फोरम, वणीच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यात आला असून संबंधित निवेदन जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्यामार्फत शासनापर्यंत पोहोचविण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी आदिवासी समाजातील उत्तमराव प्रल्हाद गेडाम, रमेश धर्माजी मडावी,रामदास गंगाराम गेडाम,भाऊराव दादाजी आत्राम, वसंत भानुदास चांदेकर, यशवंत शिवराम जुगनाके, श्रीकृष्ण दसरू मडावी, महेश रमेश मडावी, अमोल रमेश मडावी, महेश तुळशीराम आत्राम, दिलिप मारोती राजगडकर, कैलास महादेव मेश्राम, भगवान चंपत आत्राम, किशोर ऋषी चांदेकर, संदीप अशोक बेसरकर, राजेंद्र जगणाथ आत्राम व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या करून आपला निषेध नोंदविला.










