वणी नगर पालिकेला मिळणार दमदार नगराध्यक्षा ?
हौसे, गवसे आणि नवसे नगरसेवकपदासाठी निवडणुक मैदानात, सावधान वणीकर…
राजु तुरणकर – संपादक.
वणी नगर पालिकेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे विविध प्रभागात इच्छुक उमेदवारांनी आपली मोर्चे बांधणी सुरु केली आहे. अनुसूचित जमाती महिला करिता नगराध्यक्षा पद राखीव असणाऱ्या वणी नगर परिषद मध्ये राजकीय पक्षांनी योग्य उमेदवाराची निवड करुन मैदानात उतरविण्याची रणनीती आखली आहे मात्र अनेकांना नगराध्यक्षा होण्याची स्वप्न पडत असल्याने वणीकर मतदारांचे मोठे मनोरंजन होऊ लागले आहे.
अनुसूचित जमाती महिला करिता राखीव असणारे अध्यक्ष पद हे सामजिक व राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या व केवळ स्वतःला अनुसूचित जमातीचे म्हणून मला संधी द्या असा प्रकार निवडणूकीच्या निमित्ताने पहायला मिळत आहे. मात्र अशा उमेदवारांना जनता सहन करणार नाही हेही तेवढंच खर. मात्र प्रथमच हा सन्मान आदिवासी समाजातील नारीशक्ती ला मिळणार असल्याने वणी कर मतदार सुद्धा तेव्हढाच सुज्ञ असल्याने त्यांची निवड सुद्धा प्रथम नागरिक या नात्याने सन्मानित व्यक्तिमत्वाचीच करतील यात शंका नाही. वणीकर जनता त्यांच्या मनातील एका दमदार व्यक्तिमत्वाची निवड करणार असल्याची जोरदार चर्चा व प्रचंड उत्सुकता यानिमित्ताने शहरात निर्माण झाली आहे.
नगर सेवक झाले , आणि दर्शन दुर्लभ झाले…
अनेकांनी या नगर पालिकेच्या निवडणुकीत आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र मतदारांनी भूमिपुत्राला नेहमीच साथ देत मते दिली आहेत. सामाजिक त्याचबरोबर राजकीय क्षेत्रातील कोणत्याही प्रकारचे योगदान नसणारे हौसे, नवसे, गवसे या निवडणुकीत आपणच नगर सेवक होणार असल्याच्या टिमक्या वाजवत फिरत आहेत.
कोणी पक्षाच्या भरोष्यावर, कोणी पैश्यांच्या जोरावर तर कुणी भांडवलदार वर्गाचे बाहुले बनून तर कुणाला ठेकेदारी करुन पोटभरण्याचा धंदा करणारे, तर कुणी समाज विघातक धंदे करणारे नशीब आजमावणार आहे. मात्र जनतेच्या दरबारात, कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आता जनतेच्या भल्यासाठी समाजकारानासाठी राजकारणात असणारे कार्यकर्ता व्यक्तिमत्त्व तपासूनच निवड करण्याचा चंग यावेळी वणीकर नागरीकांना बांधल्याचे सार्वजनिक चर्चेतून दिसुन येत आहे.
यापूर्वी 2006,2011 व 2016 या सालामध्ये अनेक स्वयंघोषित नगरसेवकांनी या निवडणुकांचा अनुभव घेतला आहे. अनेकांनी आर्थिक प्रलोभन देत मतदातरांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. तर अनेकांनी “उसनी इमेज” वापरून प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला. अनेक उमेदवारांनी आपले नशीब अजमावले. यापैकी बहुतांशी आयात व आयत्या वेळी निवडणुकीत लढणारे उमेदवार नंतर पुन्हा लोकांना दिसले सुद्धा नाहीत. पक्षांच्या नेत्यांनी सुद्धा कधी पाहिले नव्हते असे चेहरे निवडूण आल्याने वणीकर जनतेने तोंडात बोटे टाकली होती..नंतर पाच वर्ष ज्यांचे दर्शन सुद्धा दुर्लभ झाले, काही वर्षानुवर्ष जात, पात व पैसा वापरून निवडूण येतात पण एकही ठोस काम नाही, कोणतेही सामजिक उपक्रम राबविले नाही, फक्त गोड बोलून वेळ काढू धोरण आखून सेटिंग मध्यें माहीर असतात तर माणूस तोंडाने कडवा असावा, पण गोड बोल्या भडवा नसावा हे सुद्धा जनता आता ओळखून चुकली आहे अश्या चेहऱ्यांना मतदार आता निवडणुकीत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
साध्या समस्या कचरा, पाणी आरोग्य हि सुध्दा कामे होत नाहीत, प्रत्येक वणीकर नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत, मात्र चरितार्थासाठी केलेले काम म्हणजे समाजसेवा केल्याचा अविर्भाव आणणारे ,माझे व्यक्तिमत्व उठून दिसते हे मोजमाप लावून फिरणारे तरुण तुर्क व असेच काही कॉमेडीयन नेते ही सध्या भलत्याच हवेत दिसत आहेत. प्रत्यक्षात निवडणूक आखाडा सुरु झाल्याने आता मात्र खरी कसोटी लागणार आहे. मात्र निवडणूक लढविण्याचा अधिकार संविधानाने सर्वाना दिला आहे हेही तितकेच खरे…











