आज १२ फेब्रुवारीला ‘भारत बंद’ची हाक ?
भारत-अमेरिका व्यापार कराराला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
प्रवीण रोगे, वणी :
भारत-अमेरिका व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून १२ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली आहे. त्यानिमित्त वणी येथे १२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ देशव्यापी संप व निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोर्चात भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा, विविध शेतकरी संघटना, प्रहार जनशक्ती पक्ष तसेच आयटक कामगार संघटना सहभागी होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
भारत-अमेरिका व्यापार करार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करत, चार लेबर कोड रद्द करावेत, शेती क्षेत्र अमेरिकेसमोर शरणागती पत्करू नये, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी राजीनामा द्यावा तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांचे वाढते वर्चस्व रोखावे, अशा विविध मागण्यांसाठी १२ फेब्रुवारी रोजी निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

वणी तालुक्यातील शेतकरी, कामगार व नागरिकांनी दुपारी १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सतिश देरकर, कॉम्रेड अनिल घाटे, अनिल हेपट, देवराव पाटील धांडे, दशरथ पाटील बोबडे आणि रघुवीर कारेकर यांनी पत्रकार परिषदेत केले.












